रविवार, २५ सप्टेंबर, २०१६

सुप्तशक्ती की सुप्तविधायकता ?



              सुप्तशक्ती की सुप्तविधायकता ?
          आजवर घडत आलेल्या सा-या दखलपात्र वा लक्षणीय घटनांकडे सर्वसाधारणपणे बघण्याचा आपल्या सा-यांचा दृष्टीकोन हा राजकीय परिप्रेक्ष्याचा असल्याने प्रचंड संख्येने निघणारे मराठा मोर्चे आपल्या झापडबंद विश्लेषणात सामावणे जरा अवघड होऊ लागले आहे. सुरूवातीला एकाद्या राजकीय घटकाचा सत्ताकारणाचा एक भाग असे ध्वनित केले जाणारे हे मोर्चे मात्र एकेका मोर्च्यानंतर आपली मते बदलण्यास कारणीभूत ठरत असून त्यामागे कुठले तरी सामाजिक वा आर्थिक घटक कार्यरत असल्याचे दिसत असून नेहमीप्रमाणे सरकार विरूध्द असा राजकीय पवित्रा न घेता सर्वसामान्यांचा एक सार्वत्रिक एल्गार असे या मोर्च्याचे स्वरूप दिसू लागले आहे.
माझ्या मते या कोंडीला वाट फोडून द्यायचे सारे श्रेय मराठा समाजाला तर द्यावेच लागेल त्याचबरोबर या व्यवस्थेत वंचित ठरलेल्या सा-या समाज घटकांच्या भावनाही अतिशय प्रभावी व परिणामकारकरित्या ऐरणीवर आणण्याचे काम या मोर्च्यानी केले आहे. अर्थात या सार्वत्रिक असंतोषाचे विभाजन करून त्यात आपली पोळी भाजण्याचे काम लपून राहिलेले नसले तरी त्याबाबत मराठा समाजाने घेतलेली भूमिका ही सा-या राजकीय व्यवस्थेला दिलेला एक इशारा आहे की तुमचे राजकारण आता पुरे झाले, आता जनताही शहाणी झाली आहे व वेळीच सुधरला नाहीत तर जनसामान्यांचा अविश्वासच नव्हे तर रोषालाही सामोरे जाण्याची तयारी ठेवा. त्यामुळे आपल्या प्रभागात, मतदार संघात वा राजकीय प्रभावक्षेत्रात या राजकीय नेतृत्वाची झालेली कोंडी व त्यांना त्यावर सापडत नसलेले उत्तर हे या मोर्च्याचे मुख्य फलित समजले पाहिजे व आपल्या कुटिलकारस्थाने व राजकीय डावपेचांनी सर्वसामान्यांचे जीवन हैराण करून टाकणा-या व तसे वातरत जाणा-या व्यवस्थेला कट टू साईज करण्याचे कामही या मोर्च्यांनी केले आहे.
या मोर्च्यात वंचितपणाची भावना जशी प्रकर्षाने प्रकट होतेय त्याचप्रमाणे अप्रत्यक्षरित्या का होईना नागरिकांना मिळालेल्या घटनादत्त अधिकारावर अतिक्रमण करणारी ही राजकीय व्यवस्था अनिर्बंधपणे जनतेच्या आशाआकांक्षा व इच्छाअपेक्षांची पायमल्ली करत आपले निजी कार्यक्रम वा स्वार्थ राबवण्यात कुठलाही विधिनिषेध न बाळगता स्वैर वागू लागली होती त्याचाही परिणाम जाणवतोय. सत्ताकारणात वैधअवैध, नैतिकअनैतिक, खरेखोटे मार्ग अवलंबत लोकशाहीला अपेक्षित नसलेली राक्षसी ताकद असल्याचे प्रमाण देत सामान्यांचे ज्या पध्दतीने क्षुद्रीकरण होत होते त्यातून सामूहिक निरूपाय व हतबलता वाढीस लागल्याचे जाणवू लागले होते. या असंतोषाची जाणीव इतरांपेक्षा ज्या व्यवस्थेच्या विरोधात हे सारे चालले आहे त्यांना असणारच, म्हणून त्यातून निर्माण झालेले गुजराथ व हरियानातील उद्रेक शमवण्याचे काम त्या उद्रेकांची उचित दखल न घेता केवळ पाशवी बळ वापरून करण्यात आले. त्यामानाने महाराष्ट्रात मराठा मोर्च्यांनी घेतलेली काळजी खरोखरच वाखाणण्याजोगी असून आपल्या घराला लागलेल्या आगीवर आपण बादलीभर पाणीही टाकू शकत नाही या हतबलतेला स्वतःला सर्वशक्तीमान समजणा-या राजकीय व्यवस्थेला आणून टाकण्याचे कामही याच मोर्च्यांनी केले आहे.
आपल्या माध्यमांनाही हे सारे अजून समजून घ्यायला वेळ लागतो आहे. एकतर अगोदरच प्रचलित व्यवस्थेच्या लांगूलचालनात चूकलेली आपली परखड व निरपेक्ष मार्गदर्शकाची गमावलेली वाट पकडत एकाएकी जनतेच्या बाजूने असे लिहायचे म्हणजे सारे काही विस्कटायचेच काम ठरते आहे. एकतर दूर्लक्षाने मारायचे वा दिशाभूल करायची या प्रयत्नात सारे अडकलेले दिसताहेत. माध्यमातून या मोर्च्यांचे मराठ्यांचे शक्तीप्रदर्शन असे वर्णन केले जात आहे. एकतर हा शब्द विविध घटकांमध्ये झुंज लावण्याच्या प्रवृत्तीचा निदर्शक आहे व मराठे जणू आपली शक्ती दाखवत इतर समाज घटकांवर दबाब आणण्याचे काम करीत आहेत असाही प्रचाराचा एक भाग ठरतो आहे. वास्तव असे आहे की या मोर्च्याला मराठ्यांचा पुढाकार असला तरी आपल्या मूळ संस्कृतीतील सामाजिक व आर्थिक क्षेत्राशी जुळलेल्या सा-या वंचित घटकांचे त्यात प्रतिनिधित्व जाणवते आहे व त्यात मराठा जातीपेक्षा एक व्यापक हिताची भावना व्यक्त होत असल्याने या मोर्च्यात इतरही घटकांचे अस्तित्व जाणवते आहे. जातीयवाद जेवढा राजकारण्यांच्या मनात असतो तेवढाही बाळगणे हे प्रत्यक्ष जगणा-या सामाजिक घटकांना रोजच्या जीवनात शक्य नसते व सारी सामाजिक तेढ ही गावपातळीवरच्या क्षुद्र राजकारण्यांचे कारनामे म्हणूनच कार्यरत होत असते. त्यामुळेच कोपर्डीसारख्या घटना घडतात की घडवल्या जातात हा वादाचा विषय ठरतो.
आता या निमित्ताने अप्रत्यक्षरित्या का होईना उजागर झालेली ही शक्ती वा ताकद ही हतबल झालेल्या समाजाला संजीवनी समजायला हवी. आपल्या निरनिराळ्या समस्यांना सरकारची चूकलेली धोरणे तर आहेतच, त्यांचे परिमार्जन न करता सामान्य जीवन नासवून टाकणारे गावपातळीवर सर्वासमान्यांना छळणारे साधे साधे शासकीय मुजालिम व राजकीय शक्ती शिरजोर होत त्यात तेल ओतण्याचे काम करीत. सनदशीर मार्गाने ज्यांच्याकडे तक्रार करायची ती यंत्रणाच या अवैध व्यवस्थेची लाभार्थी असल्याने सर्वसामान्यांच्या विहित हक्कांची कोंडी होत त्यांचे अपरिमित शोषण होत होते. आता या शक्ती प्रदर्शनामुळे का होईना ही व्यवस्था काही घडा घेईल असे वाटते. अशा प्रकट झालेल्या या शक्तीचे प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष फायदे असले तरी या निमित्ताने त्यातून काहीतरी विधायकता निर्माण व्हावी असे वाटते. आज राजकीयच नव्हे तर आपल्या सामाजिक व आर्थिक क्षेत्रात केवळ सरकारच्या आडमुठेपणाने अनेक सुधारांचा अनुशेष निर्माण झाला आहे. शेती, शिक्षण, आरोग्य अशा महत्वाच्या क्षेत्रात प्रचंड खर्च होऊनही सर्वसामान्यांना त्याच्या लाभापासून वंचित रहावे लागते. आज ग्रामीण जीवनाला सुजलाम सुफलाम करणा-या शेती, शेतमाल बाजार, प्रक्रिया, आयातनिर्यात या क्षेत्रात ग्रामीण तरूणांना अपरिमित संधी असून केवळ सरकारच्या मेक इन इंडियासारख्या चूकीच्या धोरणांचे बळी ठरावे लागते आहे. यातून विधायकतेचा उपयोग आपले सुखी व समाधानाचे ग्रामीण जीवन, त्यातील सामाजिक सलोखा, आर्थिक उन्नती, कौटूंबिक समाधान, अशी लक्ष्य ठेवत आपल्या छळाला कारणीभूत ठरणा-या राजकीय व प्रशासकीय व्यवस्थेचे शुध्दीकरण करण्यात वापरला तर या प्रकट झालेल्या शक्तीचे चीज होऊ शकेल. या शक्तीचा अप्रत्यक्ष वापर अशा विधायकतेत झाला तर यातून होणा-या राजकीय उलथापालथीपेक्षा ग्रामीण समाजाला खरोखर दिलासा देण्याचे श्रेय या मोर्च्यांना देता येईल.
                               डॉ. गिरधर पाटील 9422263689 girdhar.patil@gmail.com     

बुधवार, १४ सप्टेंबर, २०१६

शेतकरी असंतोषाचे विभाजन



             शेतकरी असंतोषाचे विभाजन
राज्यातीलच नव्हे तर सा-या देशात एका नव्या पर्यायाच्या शोधात असणारे राजकारण आता झपाट्याने सत्ताकारणाकडे वाटचाल करू लागल्याचे दिसते आहे. येणा-या निवडणुकांची नांदी समजायला हरकत नाही. निदान महाराष्ट्रात तरी तशा त-हेच्या चाहूलखुणा दिसू लागल्या आहेत व विरोधासाठी विरोध म्हणून का होईना जातीय अन्याय वा आरक्षणासारखे भाकड प्रश्न परत एकदा भावनिक उद्दिपनासाठी उकरून काढण्यात येत असून शेतीतील गंभीर प्रश्नांना जाणीवपूर्वक दूर्लक्षिले जात आहे. वास्तवात या समाजातील हा सारा असंतोष मुळात शेतीच्या प्रश्नांतून निर्माण झाला असला तरी त्याला एक भावनिक स्तरावर नेत नवीन उठाव वा क्रांती संबोधत सा-या माध्यमातून एक गोंधळाचे वातावरण तयार होईल असे पाहिले जात आहे. अर्थात आपल्या वस्तुनिष्ठ विश्लेषणाबाबत कधीच ज्ञात नसलेल्या माध्यमांची भूमिका ही त्यांच्या इतिहासाशी साजेशीच असली तरी सामान्यांना मात्र या सा-या बनवाबनवीतील बारकावे लक्षात येऊ लागले असून नेमकी ही बाब प्रस्थापित राजकारण्यांना खटकते आहे. खरी भीती अशी आहे की हे भावनिक उद्दिपन ओसरल्यानंतर सा-यांनाच ज्या गंभीर प्रश्नांना तोंड द्यावे लागेल त्याला आपण तयार आहोत का याचा आहे. अशा परिस्थितीत नेमके काय करावे हे न उमगल्याने सत्ताधा-यांनी थांबा, पहा मग जा ही भूमिका स्विकारली असून या गदारोळात ऐरणीवर आलेले राज्यातील प्रश्न, विशेषतः शेतीचे, परत एकदा मागे ढकलले जाऊन त्यावर कोणी बोलायला तयार नाही वा बोलू नये असे वातावरण तयार केले जात आहे. निरर्थकांचे ढोल वाजायला लागल्यावर सार्थकांची पिपाणी मूक होणार हा राजकारणातील कित्ता परत एकदा अनुभवास येऊ लागला आहे.
राज्यातील अपरिहार्य सत्ताबदलांनंतर सा-यांनी वास्तव स्विकारले असले तरी विरोधकांना सत्ताकारणाचा भाग म्हणून संधीशोधाचा कार्यक्रम कायम जारी ठेवावा लागतो. नव्या सरकारच्या शेती प्रश्नांबाबत कळतनकळत होणा-या चूका व त्यातून शेतक-यांमध्ये पसरत चाललेला असंतोष ही एक विरोधी पक्षांच्या दृष्टीने आशादायक बाब होती. जनतेच्या प्रश्नांवर लढण्याचे सर्वाधिकार व नियंत्रण आपल्या पूर्वकर्तृत्वामुळे अगोदरच सत्ताधा-यांच्या हाती सोपवल्यानंतर असा असंतोष आपोआप पसरत असेल तर तो त्यांना हवाच होता. शेतीप्रश्नांवरून सत्ताधा-यांवर जेवढी काही नाराजी वा टीका होईल ती वाढती कशी राहील व याचा पुढे आपल्याला कसा राजकीय फायदा घेता येईल याचा प्रयत्न सुरू झाला होता. मात्र शेतकरी आंदोलनातून निघालेले राजकीय विश्लेषण व स्वतः शेतकरीच आपल्या राजकीय, सामाजिक व आर्थिक परिस्थितीचे वास्तव मूल्यमापन करू लागून त्यांच्या कह्यात न आल्याने त्यांची गोची झालेली दिसते. शेतक-यांच्या दृष्टीने त्यांचे प्रश्न हे पक्षीय राजकारणाच्या परिघाबाहेर गेले असून कुठलाही पक्ष निवडून दिला तरी त्यांचे प्रश्न मात्र न सुटता अधिकोधिक गंभीर होत चालल्याचे त्याच्या अनुभवास येत आहे. पक्षीय राजकारणातील सा-या शक्यता शेतक-यांनी आजवर वेगवेगळ्या राजकीय भूमिका घेत पडताळल्या असून त्यातून त्याचा भ्रमनिरासच झाल्याचे दिसून येते. शेतकरी आता प्रस्थापित पक्षीय कचाट्यात न सापडता वेगळ्या पर्यायाच्या शोधात असल्याचे लक्षात येताच त्यांच्यातील असंतोषाचे विभाजन करून निवडणुकांचे गणित जमवायचा प्रयत्न आहे. निवडणुकांमध्ये मतांचे जेवढे विभाजन करता येईल तेवढे निश्चित मतदान हाती असलेल्यांच्या फायद्याचे असते हाही विचार यामागे असावा.
या निमित्ताने शेतकरी वर्गात नेमकी काय खळबळ चालली आहे याचा मागोवा घेणे महत्वाचे आहे. वेगवेगळे नेते, वेगवेगळ्या संघटना ज्या प्रमाणात वा पध्दतीने सक्रिय होत आहेत याच्या मागे शेतकरी व शेतीचे प्रश्नच केंद्रस्थानी दिसून येतात. या सा-या प्रश्नांचा उत्तम अभ्यास, त्याला आकडेवारीसह सिध्द करण्याच्या क्षमता ही या आंदोलनाची शक्तीस्थळे आहेत. सत्ताकारणापेक्षा आमच्या प्रश्नांची सोडवणूक याला प्राधान्य दिसून येते. या आंदोलनात आता पक्षीय राजकारणाला वा शेतक-यांचे प्रश्न हाती घेऊन एकादा प्रस्थापित पक्ष मते घेऊ शकेल एवढाही वाव राहिलेला नाही कारण या सा-या पक्षाचा अनुभव शेतक-यांनी अगोदरच घेतलेला आहे. सध्याच्या सत्ताधारी सरकारात शेतक-यांचे वा दलितांचे प्रतिनिधी मंत्री केले तरी शेतकरी वा दलितांवरचे अन्याय न संपता वाढत चालल्याने आपले उत्तर शोधण्याची जागा वेगळीच आहे हे शेतक-यांना उमगू लागले आहे. शेतकरी अशिक्षित असला तरी त्याच्या प्रत्यक्ष अनुभवांनी तो हुषार होत या सा-या परिस्थितीचे वास्तव मूल्यमापन करू लागला आहे. काही पक्षांची ताकद ग्रामीण भागावर काहीसे नियंत्रण राखून असलेल्या सहकारी संस्थात्मक क्षेत्रात जाणवत असली तरी एकंदरीत या क्षेत्राचे आजवरचे कर्तृत्व या पक्षांना तारेल असेल वाटत नाही. उलटपक्षी ते त्यांच्या विरोधातच जाण्याची शक्यता आहे.
या सा-या विवेचनाचा अर्थ शेतक-यांनी व्यवस्थित काढला आहे. आपल्या प्रश्नांची सोडवणूक ज्या विधीमंडळात होते त्यात आपले प्रतिनिधी नसल्याने सत्ताप्राप्ती म्हणून नव्हे तर आपल्या उध्दाराचे व भविष्य ठरवण्याचे हक्क व अधिकार आपल्या हाती घेण्यासाठी आपले प्रतिनिधी या विधीमंडळात निवडून पाठवणे गरजेचे आहे हे त्याला जाणवू लागले आहे. राज्यात निम्यापेक्षा असलेली लोकसंख्या व त्याला शहरी वंचितांच्या आंदोलनाची साथ मिळाली तर सरकारमध्ये आपल्या बाजूने निर्णय व्हायला काहीच हरकत नाही असा एक मतप्रवाह सध्या या सा-या आंदोलनांतून दिसून येतो आहे. आजच्या बदलत्या युगात आंदोलनांकृत परिवर्तनाच्या मावळत्या शक्यता लक्षात घेता सनदशीर मार्गाने आपले प्रश्न सोडवण्याचा निश्चित, सुरक्षित व सोपा मार्ग सध्यातरी हाच मानायला हरकत नसावी.
अशा प्रकारची मांडणी ही प्राथमिक स्तरावर कितीही आकर्षक वाटत असली तरी ती प्रत्यक्ष अमलात येण्यासाठी काही निश्चित भूमिका घ्याव्या लागतील. नवीन इमला बांधायचा असेल तर पूर्वीचा वाडा नेस्तनामूद करावा लागतो. तसा पक्षीय राजकारणाची राक्षसी पकड असलेली आपली राजकीय व्यवस्था अगोदर खिळखिळी करणे महत्वाचे आहे. निवडून कोण येतो यापेक्षाही कोण निवडून यायला नको हे शेतकरी बांधवाना ठरवावे लागणार आहे. या प्रचलित व्यवस्थेचे हस्तक परत निवडून आले तर शेतक-यांच्या प्रश्नांना नेहमीप्रमाणे खोडा घालण्याची शक्यता असल्याने प्रस्थापित सत्तापिपासू राजकीय पक्षांचा एकही उमेदवार निवडून येता कामा नये हे अगोदर शेतक-यांना ठरवावे लागेल. यांच्या व्यतिरिक्त कोणीही सोम्यागोम्या निवडून आला तरी तो तेवढा घातक नसल्याने त्याची काळजी करण्याचे कारण नाही. एकंदरीत आपल्या हाती असलेल्या या निवडीच्या अधिकाराची व्यवस्थित हाताळणी केली तरी लाखोंच्या आंदोलनापेक्षा ती निश्चितच परिणामकारक असेल एवढेच या निमित्ताने !!
                                                             डॉ. गिरधर पाटील 9422263689  

रविवार, ४ सप्टेंबर, २०१६

जखम आर्थिक, फुंकर अस्मितेची !!



          जखम आर्थिक, फुंकर अस्मितेची !!
गेल्या काही दिवसात आपले सारे राजकीय सामाजिक जीवन ढवळून निघते आहे. एकाद्या वर्गावर होणा-या अत्याचारापेक्षा एकाद्या जातीवर होणा-या अत्याचारांची तीव्रता अधिक ठरते आहे. अत्याचार हा अत्याचार असतो तो कोण कोणावर करतो याची कारणे आपल्या व्यवस्थेतच असतात. पूर्वी ती त्यावेळच्या परिस्थितीनुसार सामाजिक म्हणजे जातीय असत, आज ती आर्थिक विषमतेपोटी आलेल्या नैराश्यात दिसतात. गमावलेल्या जीवाची किंमत आईच्या अश्रुंमधून मग जीव बलात्कारासारख्या निर्घृण अत्याचारामुळे गेलेला असो की शाळेत जायला पासला पैसे नाहीत म्हणून चिमुरडीने दिलेला असो, सारखीच असते. त्याची सम्यक प्रतिक्रिया तशी समाजाकडून अपेक्षित असते. कारण समाजाला अशा भावनिक पातळीवर गमावलेल्या जीवांबद्दल भेदभाव बाळगणे हे प्रश्न कायमस्वरूपी सुटण्याच्या दृष्टीनेदेखील अडचणीचे ठरते. मात्र यातून निर्माण होणारी व सर्वसामान्यांना जाणवणारी असुरक्षितता नेहमीच जागृत ठेवत समूहांचे वैचारिक कोंडवाडे करत त्यावर राजकारणाची पोळी भाजायची हे प्रकार काही नवे नाहीत. आजच्या मराठा समाजाची अचानकपणे त्यांच्यावरच्या अन्यायाची जाणीव करून देणा-या विराट मोर्च्यांची दखल घेतांना यातील काही मुद्यांचा परामर्ष घेता आला तर या समाजाच्या प्रश्नांकडे व त्यांची सोडवणूक होण्याच्या दृष्टीने योग्य ठरेल.
याच चावडीवरून मी मागे लिहिलेल्याकोपर्डीचे वास्तवया लेखात काही विधाने केली होती. त्यात परिस्थितीचे विश्लेषण करतांना, या बलात्कारीय निर्घृणतेच्या पलिकडे असलेला कितीतरी क्रूर असा मानवी चेहरा बघायला मिळतो त्याचा उगम कुठून झाला व एकाच गावात रहाणा-या ग्रामस्थामध्ये एकमेकांविषयी एवढा तिरस्कार कसा निर्माण करता येऊ शकतो हेही न उलगडणारे कोडे आहे. (सर्वसाधारणपणे गावात रहाणारा व तसा कुठलाही उद्देश नसणारा सामान्य माणूस असे कृत्य करू शकत नाही, त्यामागे इतर प्रेरणा कार्यान्वित व्हाव्या लागतात) मानसशास्रीय दृष्ट्या बलात्काराला विरोध करणा-या पिडित मुलीवरचा अत्याचार हा त्यापुरताच मर्यादित असतो. मात्र या बलात्कारानंतर त्या पिडितेची अवस्था एवढी भीषण व अमानुष करण्यात आली की बलात्कारापेक्षा त्यातील भीषणतेला प्राधान्य देण्यात आलेले दिसते. जे अधिक भावनोद्दिपित करणारे ठरते. यातून बलात्कारींना वा इतरांना या घटनेला हीन स्वरूप देणा-या प्रवृत्ती व प्रेरणा या सामान्य स्वरूपाच्या नाहीत. अर्थात या सा-या घटनेचे झालेले राजकियीकरण बघता नेमके काय झाले हे बाहेर येणे कठीण असले तरी या प्रकरणात काही तरी वेगळे पाणी मुरतेय एवढे मात्र नक्की. असे मी म्हटले होते. या वक्तव्यावर बरीचशी वादावादीही त्यावेळी झाली. मात्र ती वेळ एवढे दूरदर्षी अनुमान काढण्याची नसल्याने व त्यातून परत जातीयवादालाच खतपाणी मिळत त्याची चर्चा टाळण्याच्या दृष्टीने पुढे काय होते हे पाहून ठरवावेसे वाटले.
आज जी काही परिस्थिती तयार होते आहे तिलाही संशयाचा फायदा देत यामागे केवळ मराठा समाजाचा आक्रोशच आहे, बाकी काही नाही असे समजता येईल. मग प्रश्न उभा रहातो मराठा समाजावरील ख-या अन्यायाचा, ज्या विरोधात या समाजाने आज नव्हे तर कधीच पेटून उठायला हवे होते. उलट आजवरच्या अन्यायाविरोधात समाज पेटून का उठत नाही हा समाज अभ्यासकांच्या आक्षेपाचा रोख याच समाजाकडे जातो. तसा हा समाज ग्रामीण आहे व प्रामुख्याने शेती, राजकारण, शिक्षण, सहकार, नोकरी याच्याशी संबंधित आहे. आता ही सारी क्षेत्रे गंभीरस्वरूपात समस्या वा अन्यायग्रस्त आहेत. गंमत अशी की या विचित्र परिस्थितीत अन्याय करणारे व अन्यायग्रस्त याच समाजाचे दिसतात. म्हणजे साखर सम्राट उस उत्पादकांचे शोषण करीत असतात, शिक्षण सम्राटांनी मराठा म्हणून कुणाला फुकट प्रवेश दिल्याचे एकही उदाहरण नाही, राजकारणी तर प्रत्येक कामाचे रेटकार्ड दाखवत पैसे घेऊनच बदल्या व टेंडरची कामे करीत असतात, नोकरीत असलेले तलाठी, पोलिस, शासकीय कर्मचारी हे बव्हंशी मराठाच असून त्यांच्याविरोधात होणारी सारी ग्रामीण मराठा समाजाची जाहीर तक्रार ही आजवर अन्यायग्रस्त समजली गेली नाही. म्हणजे आजचे मोर्चे हे या अन्यायग्रस्त समाजाचे समजायचे की ज्यांच्या हातातून अन्याय करण्याची हत्यारे गमावली गेली त्यांचे समजायचे हे लक्षात येत नाही. अन्यायग्रस्त समाजाचे असतील तर त्यांचे स्वागतच आहे पण त्यातून सत्ता गमावलेल्या शक्तींचा एकादा राजकीय प्रयत्न असेल तर नुकतीच मागच्या निवडणुकीत अपेक्षाभंग झालेली भोळीभाबडी जनता परत एकदा अशा राजकीय कटकारस्थानाला बळी गेल्याचे स्पष्ट होईल.
 आम्हीही चळवळीत तीसतीस वर्षे घालवली आहेत. एकाद्या गंभीर वा महत्वाच्या प्रश्नावर पाचपंचवीस लोकांचे आंदोलन उभे करायचे म्हटले की काय प्रसंगांना तोंड द्यावे लागते हे आम्ही अनुभवले आहे. त्यावेळी आपल्या रोजीरोटीशी संबंधित असलेल्या प्रश्नापेक्षा कुणाला आपला पक्ष महत्वाचा वाटतो, कुणाला दहावेतेरावे असते तर कुणाला जाहीररित्या काही करायचे नसते. म्हणजे प्रश्न यांचे दुस-यांनीच सोडवायचे आणि निवडणुका आल्या की हे भलत्यालाच फेटे बांधणार, एवढेच नव्हे तर घरातल्या बाईला औक्षण करायलाही पाठवणार आणि फोटो काढून मिरवूनही घेणार असा हा सारा अज्ञानमूलक मामला आहे. आज हा समाज सा-या राजकीय पक्षांमध्ये सारखाच सक्रिय असलेला दिसतो व पूर्वीचे गावचे पाटील सारा गोळा करून वतनदाराला पाठवायचे तसे आजच्या शोषक राजकीय व्यवस्थेचे हस्तक होत आपल्याच भाऊबंदांच्या शोषणावर आपल्याला चार तुकडे मिळवतो. या गैरप्रक्रियेत होणा-या कारवाईतही आपलाच बळी जाणार हे सिध्द होऊनही या समाजाला तशी जाग येत नाही.  असा हा समाज आपल्या ख-या प्रश्नांना बाजूला सारत अचानकपणे लाखोंच्या संख्येनी एकत्र येऊ लागतो तेव्हा मात्र या सा-या प्रकाराची शंका येणे क्रमप्राप्त आहे. या संघटनातून या समाजाची नव्हे तर या समाजाला नियंत्रित करणारी जी काही घराणी आहेत त्यांची ताकद दिसते असे म्हटले तर वावगे ठरू नये
यातून या समाजाला दोष देण्याचा उद्देश नाही तर आजच्या परिस्थितीत जात म्हणून एकत्र येण्यापेक्षा वर्ग म्हणून वास्तववादी, व्यवहारवादी, अर्थवादी विचारसरणीचा स्विकार केला तरच काही मार्ग दिसू शकेल. कारण सत्ता येत राहील, पक्ष येत रहातील, नेतेही येत रहातील पण या सा-यांच्या वापरातून हा समाज मात्र आहे तिथे असल्याचे दिसेल एवढे मात्र नक्की !!
                                                           डॉ. गिरधर पाटील  9422263689