लोकशाही नेमकी कुणासाठी ?
स्वातंत्र्यानंतर
देशातील राज्यव्यवस्था म्हणून आपण लोकशाही स्विकारली हे खरे असले तरी जगभरात
लोकशाहीचे जे अध्यारूत प्रारुप शिष्टसंमत होते, अगदी तसे नसले तरी नावाने लोकशाही,
परंतु प्रत्यक्षात एक वेगळ्याच राजकीय संस्कृतीची निर्मिती आपण केली असल्याचे
मान्य करावे लागेल. अर्थात शतकानुशतके लोकशाहीच्या विरोधात जाणा-या एकानुवर्ती
राज्यपध्दतीच्या विशिष्ठ व्यवस्थेत व मानसिक अवस्थेत वावरलेल्या भारतीय समाजाला हे
सारे बदल अचानकपणे स्विकारणे समर्थनीय नसले तरी किमान या बदलांची दिशा लोकशाहीला
अभिप्रेत असलेल्या तत्व व उद्दिष्ट समावेशक असती तरी ते मान्य व्हावयास हरकत
नव्हती. मात्र प्रत्यक्षात आपल्याकडे लोकशाहीच्या नावाने जो काही कारभार चाललाय तो
भारतीय जनतेच्या आशाआकांक्षांना मूठमाती देत घटनेतील समता व बंधुत्वाला छेद देणारा
ठरतो आहे. मुळातच सामाजिक, राजकीय व आर्थिक विषमता हे भारतीय समाजाचे वास्तव
लोकशाहीत किमान समानतेच्या पातळीवर येण्याची प्रक्रिया न जाणवता सारा समाज या
सा-या क्षेत्रांत विषमतेचा बळी ठरतो आहे.
लोकशाहीची फळे चाखण्यासाठी ती अगोदर रुजवावी लागते, जोपासावी लागते. ज्या लोकशाह्यांकडे
आम्ही आदर्श म्हणून पहातो त्या तेथे गेली शतकानुशतके स्थिरावलेल्या आहेत.
सुरुवातीला येणा-या अनेक अडचणींवर मात करीत लोकशाहीची मूल्ये त्यांनी जोपासली
आहेत. हे करत असतांना त्यांनी लोकशाहीचा आत्मा गमावू दिलेला नाही. अर्थात सामाजिक
एकजिनसीपणा व साक्षरता ही त्यांची जमेची बाजू असल्याने तेथल्या लोकशाह्यांना
लाभलेले एक जनहिताचे परिमाण सक्षम व सुदृढ झाल्याचे दिसते. भारतीय लोकशाहीला
मूळताच अभिप्रेत असलेल्या एकजिनसीपणाच्या अभावामुळे तेथील वांशिक, धार्मिक, जातीय,
भाषिक, आर्थिक विषमता या सा-या घटकांना किमान समान मानसिकतेवर आणण्यात आपण अयशस्वी
ठरलो आहोत. म्हणूनच लोकशाही असून देखील तिच्या लाभापासून वंचित रहात एका नव्या
संकटाच्या प्रश्नावलीला सामोरे जाण्याची वेळ आपल्यावर आलेली आहे.
अर्थात भारतीय स्वातंत्र्याला फाळणीची एक काळी बाजू असल्याने सामाजिक
एकजिनसीपणाला अगोदरच सुरुंग लागल्याचे दिसते व सारी राजकीय व्यवस्था सामाजिक व
राजकीय समायोजनात गुंतत आधुनिक समाजाची गुणवैशिष्ठे मानली जाणारे आर्थिक क्षेत्र
मात्र दूर्लक्षिले गेल्याचे दिसते. त्यात शेतीही आली. जागतिक बदलांच्या दिशांचे
अनुकरण करत आपण औद्योगिकरणाचा आधार घेतला तरी त्याच्या मूलभूत गरजांसाठी
शेतीक्षेत्राचा मात्र नाहक बळी दिल्याचे दिसते. आज जागतिक बदलाचे परिणाम भारतीय
अर्थव्यवस्थेवर पडत असल्याचे दिसले तरी त्यात भारतीय समाजाचा मूळ पिंड, त्याच्या
भौगोलिक शक्तीस्थळामुळे प्राप्त झालेले शेतीचे अन्योन्य स्थान यांना प्राधान्य न
मिळाल्याने एक असंतुलित व विषमतेची दरी निर्माण करणारे भ्रामक विकासाचे प्रारूप
आपण अनुभवत आहोत. स्वातंत्र्याच्या वेळी भारतीय रुपया हा एक डॉलर समान व जागतिक
बाजारात कृषि उत्पादनाच्या निर्यातीत चांगले स्थान मिळवून होता. भारतीय कृषि
उत्पादने त्याकाळी सा-या जगाचे आकर्षण केंद्रे ठरली होती. इंग्रजच नव्हे तर डच,
पोर्तुगीज या पाश्चात्य विकसित संस्कृती भारतावर वर्चस्व मिळवण्यात अग्रेसर होत्या
त्या उगाचच नव्हे. त्यातही या औद्योगिक क्षेत्राने जर पराक्रम गाजवत यश मिळवले
असते तरी शेतक-यांच्या या योगदानाला काही अर्थ प्राप्त झाला असता. मात्र कायम
सरकारी संरक्षणात वावरलेल्या औद्योगिक क्षेत्राची भरारीही मर्यादित राहिली. मात्र
या धोरणांमुळे शेती तोट्याची ठरत गेल्याने वाढत्या लोकसंख्येला उपजिविकेचे नवे
पर्याय शोधतांना इतर क्षेत्रांचाच आधार घ्यावा लागला त्यामुळे परिणामी शेतीक्षेत्राचे
नुकसानच झाले. कदाचित शेती जर उत्पादक व नफ्याची ठरली असती तर आजचे बेरोजगारी,
बकाल शहरीकरण व त्यातून उद्भवणारी विषमता आपण टाळू शकलो असतो. त्यावेळी देशातील
पासष्ट टक्के लोकसंख्या शेतीवर अवलंबून होती व राष्ट्रीय सकल उत्पन्नात तेवढाच
वाटाही होता. मात्र शेतीतून निर्माण होणारी बचत व वरकड ही शेतीत परत येऊ न देता
सा-या शेतमालाचे भाव एका विशिष्ठ पातळीवर आपल्या हस्तक्षेपाने ठेवत सरकारने आपली
धोरणे औद्योगिक क्षेत्राला अनुरूप रहातील अशी ठेवली. या धोरणांमुळे आज
शेतीक्षेत्राचे राष्ट्रीय सकल उत्पन्नातील वाटा सत्तावीस टक्क्यांवर आला असून
लोकसंख्या मात्र जवळपास तेवढीच अवलंबून आहे.
शेतीक्षेत्राचे हे घटते योगदान त्यातील उत्पादकतेशी जोडले जाते. त्यात इतर
क्षेत्रांच्या योगदानाची आकडेवारी दिली जाते. ही एक आकडेवारीची चलाखी असून आपला
कुठलाही दोष नसलेल्या कृषिक्षेत्रावर अन्याय करणारी आहे. याचे एक उदाहरण देऊन ही
स्पष्ट करता येईल. समजा तीन भावांचे एक शेतकरी कुटूंब आहे. या कुटूंबाचे शेतीतले
उत्पन्न क्ष समजू. मोठा भाऊ शेती सांभाळत त्यातून आलेल्या बचतीतून आपल्या दोन
भावांना शिकवतो व कामधंदा वा नोकरीला लावतो. आता या सर्वांच्या एकूण उत्पन्नामुळे
या कुटूंबाचे उत्पन्न य होते. आता य च्या तुलनेत क्ष चे कमी झालेले उत्पादन म्हणजे
शेतीतले उत्पादन कमी झाले असे नसून इतर उत्पन्नाच्या तुलनेत त्याचे प्रमाण बदलले
आहे. उलट भारतीय शेतीचे देशाच्या उत्पन्नातील एकूण योगदान बघितले तर एकेकाळी भुकेल्या
समजल्या जाणा-या देशात अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्णता, काही कृषि उत्पादनात
निर्यातीत अग्रेसर व एकूणच वाढत्या उत्पादनामुळे निर्माण झालेले प्रश्न यांच्याशी
जोडता येईल. उलट शेतीतील आजच्या समस्या या शेतीशी संबंधित नसून सरकारच्या चुकीच्या
धोरणांचा परिपाक आहे हे सिध्द झाले आहे. त्यामुळे शेतीला उत्पादकतेचे दोषी
ठरवण्यापेक्षा शेतक-यांच्या हिरावून घेतलेल्या भांडवलाची पुनर्स्थापना,
शेतीउत्पादनाचे उचित मूल्यमापन व त्यातील नफ्याचा भाग शेतमाल उत्पादकापर्यंत
नेणारी बाजार व्यवस्था व या शेतमालाच्या जागतिक बाजारातील स्थानाचे निश्चितीकरण
असे उपाय हाती घ्यावे लागतील.
आजच्या सरकारच्या प्राथमिकता याही शेती विरोधीच असल्याचे दिसून येते. याचे
प्रमुख कारण म्हणजे राज्यकर्त्यांना न समजलेली शेती. ज्या विषयात आपल्याला फारसे
कळत नाही वा गम्य नाही त्याला हात घालून आपले हसे करून घ्यायची सरकारवर आली आहे.
केवळ सत्ताकारण व निवडून येण्यासाठी शेतक-यांना उत्पादन खर्चावर पन्नास टक्के नफा
असा दर दिला जाईल हे आश्वासन किती तकलादू आहे हे या सरकारला निवडून आल्यावर समजले.
शेतक-यांचे उत्पन्न पाच वर्षात दुप्पट करणार ही घोषणा सरकारच्या महागाई वाढू नये
म्हणजे देशातील शेतमालाला भाव न देता आयात करण्याच्या घोषणा हे सारे विरोधाभासी
आहे. एकंदरीत भारतीय लोकशाही ही केवळ सत्ताधा-यांसाठीच चालवली जाते असे सारे चित्र
दिसते आहे.
डॉ. गिरधर पाटील 9422263689