रविवार, १७ सप्टेंबर, २०१७

कर्जमाफीच्या अपरिहार्यता.....



            कर्जमाफीच्या अपरिहार्यता.....
     सध्या कृषिक्षेत्रात गाजत असलेला कर्जमाफीचा मुद्दा अनेक परिमाणे ओलांडत आता शेतकऱ्यांचा आवाका व सरकारच्या नियंत्रणाबाहेर नेला जात आहे. एक मात्र खरे की राजकीय पंडीतांनी हा कर्जमाफीचा मुद्दा अशा अवस्थेत आणून सोडलाय की सरकार व शेतकरी या दोघांनाही ना तर तो गिळता येत ना तर ओकता येत. या राजकीय खेळात या मुद्यावर शेतकरी एवढा संवेदनशील झालाय की कर्जमाफीबद्दल कुठलेही वास्तव विश्लेषण करायला घेतले की त्याला लगेचच शेतकरी विरोधक समजत ते हातघाईवर येऊ लागतात. अर्थात खुद्द शेतकऱ्यांचे समजले जाणारे पुणतांब्यांचे आंदोलन हाताळण्यात तत्कालिन शेतकरी नेतृत्वाच्या काही चूका झाल्या असल्यातरी त्या अपयशाच्या धक्क्यातून शेतकरी मात्र अजूनही सावरू शकत नाही. या शेतकरी नेतृत्वाला सरकारची एकंदरीत भूमिका लक्षात न आल्याने सारे आंदोलनच भरकटले व सरकारला जे हवे होते ते घडत या आंदोलनाची गंभीरता व तीव्रता क्षीण होत गेल्याचे दिसते. कर्जमाफी मिळाली तर कुणाला नको आहे असे मुळीच नसतांना त्या बाबतीतले वास्तव न समजून घेता, त्याबाबतची परिणामकारक भूमिका न ठरवता हा लढा चालूच राहिला तर त्यातून फारसे निष्पन्न व्हायची शक्यता नाही.
          मुळात देशात झालेल्या राजकीय परिवर्तनामुळे कर्जमाफीच नव्हे तर शेती व शेतकऱ्यांच्या साऱ्यां प्रश्नांचे परिप्रेक्ष्यच बदलले असल्याने शक्यता व संभाव्यातांचे गणित बदलले आहे. पूर्वीचे सरकार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या बाबतीत फार सकारात्मक होते असेही नाही. त्यांची कर्जमाफीही हा शेतकरी प्रेम नव्हे तर एक राजकीय निर्णयच होता. विरोधकांची शेतकऱ्यांमध्ये काय परिस्थिती आहे व शहरी मते निवडणुकांवर काय परिणाम घडवू शकतात याचा तत्कालिन सत्ताधाऱ्यांना अंदाज न आल्याने व भाजपासारख्या सत्ताविन्मुख पक्षाने आता नाही तर केव्हाच नाही अशी प्रचारात आघाडी घेत सत्तेवर ताबा मिळवल्याचे दिसते. त्याहीवेळी म्हटले जायचे की निवडणुकांमध्ये शेतकऱ्यांची मते निर्णायक ठरत नाहीत. दर निवडणुकीचे विशिष्ठ एक गमक असते व ती नस ज्या पक्षाला सापडते त्या पक्षाला यश मिळण्याच्या शक्यता वाढतात.
भाजपाला मागच्या निवडणुकीत शहरी मतदारांची अलिबाबाची गुहा सापडली व आपल्या कार्यक्रम पत्रिकेला अनुरूप असलेल्या या वर्गाला कुरवाळले तर आपले कायमचे मतदारसंघ तयार होत सत्तेवर कायम ताबा ठेवता येईल अशी त्यांची अटकळ आहे. या साऱ्या चित्रात ग्रामीण भाग व शेतकरी कुठेही नाही हे लक्षात घेतले पाहिजे. आजही त्यांच्या अभ्यासानुसार सत्ताप्राप्तीसाठी आवश्यक असे मतदारसंघ आजच तयार आहेत व त्यासाठी त्यांना शेतकऱ्यांची गरज नाही असे त्यांचे नेते जाहीरपणे बोलू लागले आहेत.
या जाहीर वक्तव्यापूर्वीची या नव्या सरकारची शेतकरी धोरणे बघितली तर ती फारशी सकारात्मक असल्याचे दिसत नाही. एका मोठ्या वर्गाला कशाला दुखवायचे म्हणून ते काहीतरी सांगून वेळ मारून नेत मात्र प्रत्यक्षात या वर्गाला काहीच मिळणार नाही याची दक्षताही घेतली जात होती. भाजपाचा स्वतःबद्दलचा आत्मविश्वास व घेतलेली मेहनत गृहित धरूनसुध्दा एवढीवर्षे आपल्याला सत्ता मिळू न देण्यात केवळ ग्रामीण भागच कारणीभूत असल्याचा गैरसमज आजही आहे व या वर्गावर असलेला राग आताशा स्पष्टपणे व्यक्त होऊ लागला आहे. दुष्काळातील सरकारची भूमिका केवळ तोंडदेखलेपणाची होती व माध्यमे हाताशी धरून सरकार फार काही करते आहे असे चित्र तयार करण्यात आले. जलस्वराज योजनेचा पहिल्याच वर्षी फज्जा उडाला असून ज्या भागात काम झाल्याचे सांगितले जाते तो मराठवाडा व विदर्भ आजही दुष्काळाला बळी पडल्याचे दिसते आहे. हमी भावाचे प्रश्न असतील, सोयाबीन, तूर, कांदा या साऱ्या संवेदनशील व शेतकऱ्यांना दोन पैसे मिळवून देणाऱ्या पिकांबाबत सरकारने कुठलीही स्पष्ट भूमिका न घेता उलट त्यातली गंभीरता वाढत ते क्लिष्ट करण्यात आले.
कर्जमाफीच्या बाबतीतही सरकारची सुरूवातीची भूमिका नकारात्मकच होती व मुख्यमंत्री कर्जमाफीच्या विरोधातच होते. मात्र निवडणुकांमध्ये तो कळीचा मुद्दा होऊ शकतो व शिवसेना संपवण्याच्या प्रयत्नात त्या निवडणुकीत केवळ कर्जमाफीमुळे शिवसेनेला बळ मिळाल्याचे दिसताच दिल्लीवरून शेतकऱ्यांविषयाची भूमिका मवाळ करण्याचा निरोप आला असावा. या निवडणुकांचा परिणाम म्हणा व त्याचवेळी निघू लागलेले लाखोंचे मराठा मोर्चे म्हणा वा पुणतांब्यासारख्या अराजकीय क्षेत्रातून केवळ शेतकऱ्यांचे म्हणून उभे राहिलेले आंदोलन म्हणा सरकारला माघार घेत कर्जमाफी देत असल्याचे जाहीर करावे लागले. मात्र यातही सरकारने तत्वतः, सरसकट व अतार्किक अटींचा मारा करत या साऱ्या कर्जमाफीतील हवाच काढून टाकली आहे.
आताच्या परिस्थितीतून दोन शक्यता उद्भवतात. एकतर सरकारचे वागणे इतके अन्यायी व अतार्किक ठरावे की कुणातरी भेदभावाच्या मुद्यावर न्यायालयात गेले तर सरकारला ते हवेच आहे, कारण त्यामुळे चेंडू न्यायालयात जात सरकारला त्या जबाबदारीतून आपली मान सोडवून घेता येईल. दुसरी शक्यता अशी आहे की आलेल्या अर्जातून काही विशिष्ठ शेतकऱ्यांना थातूरमातूर कर्जमाफी दिल्याचे दाखवायचे व इतरांना छाननीच्या नावाने लटकवून ठेवायचे व शेतकरी आंदोलनातील सारी हवाच काढून टाकायची अशी ही रणणीती आहे. यावरचा शेतकऱ्यांच्या बाजूचा उपाय म्हणजे शेतकरी मते निवडणुकीत प्रभावी ठरत नाहीत हा समज खोटा ठरवणे. काय म्हणता ?
                                                                     डॉ. गिरधर पाटील 9422263689

रविवार, ७ मे, २०१७

जनता महत्वाची की सरकार ?



             जनता महत्वाची की सरकार ?
          म्हणायला आपण लोकशाही स्विकारल्याचे दिसत असले तरी आपले सारे जनजीवन हे विरोधाभासानी भरले जात असल्याचे दिसून येईल. लोकांनी, लोकांद्वारा, लोकांसाठी योजलेली लोकशाही यातील लोक नेमका कुठे लोप पावला हे लक्षात न आल्याने या व्याख्येचे मूळ प्रयोजनच हरवल्यासारखे दिसते आहे. आपण आपल्यासाठी निर्माण केलेल्या लोकशाही गाभा असलेल्या साऱ्या संकल्पनात्मक, संस्थात्मक व्यवस्था आज आपल्याच विरोधात उभ्या ठाकत स्वातंत्र्यापूर्वी सुराज्य व समृध्दीची जी स्वप्ने पाहिली गेली त्यांना बाजूला सारत एक वेगळीच व्यवस्था उभी रहात स्वातंत्र्य मिळाल्याचा सर्वसामान्यांना काही एक लाभ मिळू द्यायचा नाही अशा अविर्भावात आव्हान देऊ लागली आहे. अर्थात या नकळत झालेल्या प्रक्रियेला निसर्गनिर्मित कारणांबरोबर आपल्याला लोकशाही समजून न घेता ती राबवता न आल्याने जनतेच्या पदरातही या अपयशाचे फलित टाकता येईल.
          या आजच्या चित्राचे नीटसे आकलन करून घ्यायचे असेल तर काही समर्पक उदाहरणांची मदत घेत ते समजून घेता येईल. शहरांतून कुत्रा पाळणे व शेतकऱ्याने कुत्रा पाळणे यात फरक आहे. म्हणजे प्रगत देशातील लोकशाही व भारतासारख्या सरंजामी मानसिकेतेची शिकार झालेल्या जनतेची लोकशाही यात फरक करायला हवा. शेतकऱ्यांच्या कुत्र्यावर शेताच्या व बकऱ्यामेंढ्यांसारख्या ढोरढाकऱ्यांच्या रक्षणाची जबाबदारी असते. आपले काम प्रामाणिकपणे केल्यानंतर कुत्रा धन्याच्या दाराशी येऊन बसतो व शेतकरीही जेवणाची वेळ झाली की आपल्या ताटातील कोरचतकोर भाकर टाकत (आपण देत असलेले कर) त्याच्या पालन पोषणाची काळजी घेत असतो. इथवर हे सारे वैधानिक व नैसर्गिक असल्याचे दिसून येईल. मात्र कल्पना करा कुत्र्याच्या डोक्यात (माफ करा, कुत्रा असे करू शकतो याची कल्पना करणेही कुत्र्यावर अन्याय करण्यासारखे होईल, पण एक काल्पनिक उदाहरण म्हणून आपण तशी मांडणी करतोय) हवा जात आपल्या कामासंबंधी काही विकृत समीकरणे तयार होत या व्यवस्थेतील आपले साधारण स्थान विसरत आपण अनन्यसाधारण असल्याचे समजत वावरू लागला तर शेतकरी, शेत रक्षणाच्या जबाबदाऱ्या या गौण ठरत साऱ्या व्यवस्थेची प्राथमिकता ढासळत एक असंतुलनाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. म्हणजे कुत्रा आपले वैधानिक काम विसरत शेतकऱ्याला आपला मूळ उद्देश असलेले शेतीचे काम करणे अशक्यप्राय करून टाकणे (शेती विरोधी कायदे), आपल्या जबाबदाऱ्या विसरत एकाद्या झाडाच्या सावलीखाली झोपा काढणे (वेळेवर निर्णय न घेणे), भूक असो की नसो (अवाजवी करांचा बोजा) शेतकऱ्याच्या अंगावर जाऊन त्याचे ताट हस्तगत करून आपली राक्षसी भूक भागवणे, (सक्तीची वसूली), प्रसंगी शेताचे, प्राण्यांचे नुकसान होत असले तरी त्याकडे दूर्लक्ष करणे (वंचितांच्या शोषणाकडे दूर्लक्ष), शेतकरी, त्याचे आप्तस्वकियांना मज्जाव करत चोरांना वाव देणे (कायदा व सुव्यवस्था), आपला खरा अन्नदाता कोण आहे हे विसरत शेजारच्यांचे हित पहाणे (डागाळलेल्या अनावश्यक आयाती निर्याती), या अशा अनेक बाबींचा समावेश करता येईल.
          आता या परिस्थितीला कारणीभूत असलेले शेतकऱ्याचे अज्ञान, असंघटितपणा, आपलेच भाऊबंद जातीधर्म, पक्षांच्या आधीन जात निजी स्वार्थ विसरलेले, आर्थिक निरक्षरता, व्यावहारिकतेचा व हिशोबीपणाचा अभाव, वस्तुनिष्ठतेचा अभाव, निवडीच्या लोप पावलेल्या क्षमता, त्यात भर घालणारी दुष्काळ, अतिवृष्टी, गारपीटीसारखी अस्मानी संकटे हे सारे असले तरी त्यातून मार्ग काढणे हे आज जिकिरीचे ठरू लागले आहे. एकेकाळी आपल्या दाराशी बसून चतकोर भाकरीची अपेक्षा करणारा आपणाच पाळलेला कुत्रा असा कसा वागू शकतो हे त्याला कळनासे झाले आहे. ही हाताबाहेर गेलेली परिस्थिती हाताळणे अशक्यप्राय होत असल्याने तो आपल्या घरातील दोरखंड व झाडाची फांदी शोधू लागला आहे. वास्तवात कुत्र्यात असलेल्या काही अवगुणांना वाव मिळेल अशी परिस्थिती निर्माण होऊ देण्यात शेतकऱ्यासह साऱ्यांचा सारखाच सहभाग असल्याचे दिसून येईल. म्हणजे कुत्र्याच्या साऱ्या सामाजिक, आर्थिक सुरक्षेची हमी, चुकांना प्रायश्चित्त नसणे, कामाची जन्मभरची निश्चिंतता व त्याला घटनात्मक हमी, बांधिलकी जनतेशी की सत्ताधाऱ्यांशी यातील संदिग्धता,यातून त्यांचे स्वार्थ जोपासण्याची क्रिया इतकी पराकोटीला गेली की शेताच्या मालकाला हा कुत्रा जुमानेसा झाला आहे.
          आता शेतमालकाच्या मनातील खळबळ त्याला अस्वस्थ करू लागली आहे. आपल्या हक्कासाठी कसे लढावे हा त्याच्यापुढचा मोठा प्रश्न आहे. स्वातंत्र्य मिळवतेवेळी परकीय सत्तेकडून काहीतरी मिळवण्याची जी काही आंदोलनात्मक हत्यारे वापरली जात नेमकी तीच, पण आज निष्प्रभ ठरलेली हत्यारे वापरत आपस्वकियांशीच लढण्याची वेळ त्याच्यावर आली आहे. एकतर या साऱ्या गदारोळातून वैधानिक मार्गाने शेतकऱ्यांना दिलासा देणारे नेतृत्व आज दृष्टीपथात येत नाही. आहे ते आपले सारे राजकीय इप्सित साध्य करण्यासाठी मतांच्या राजकारणाचे निवेदने, रस्ता रोको, उपोषणे, यात्रा, यासारखी वर्षानुवर्षे निष्फळ ठरत आलेली आंदोलने केली जात आहेत. मुख्य म्हणजे या प्रश्न सोडवण्याची जबाबदारी ज्या लोकप्रतिनिधींची असते ते विरोधातील वा सत्तेतील, साऱ्यांनी शेतकरी हिताचा गदारोळ उठवत आहे त्या गोंधळात भर टाकण्याचेच काम चालू आहे. म्हणजे वैधानिक मार्गाने आपल्याला शेतकऱ्याला दिलासा देण्याऐवजी केवळ शेतकऱ्यांना कारूण्याचा विषय करत त्यासाठी आपल्यापेक्षा इतरांनी काय केले पाहिजे याच्या मागण्या करत आंदोलने केली जात आहेत. शेतकरीही आपल्या लोकप्रतिनिधींना लक्ष्य न करता त्यांना जबाबदार न धरता त्यांच्यामागे फरफटत जात आहेत. आज शेतकऱ्यांच्या प्रश्नांना जबाबदार असलेले सारेच, मग ते सत्तेत असतील वा विरोधात, विधानसभेच्या बाहेर जो गोंधळ घालताहेत, त्यापेक्षा आकड्यांची मदत घेऊन शेतकरी हिताचे प्रस्ताव मांडत शेतकऱ्यांच्या बाजूचे खरे कोण आहेत हे त्या प्रस्तावाच्या बाजून वा विरोधात मतदान करतांना उघडे पाडता येऊ शकते. मात्र त्यात आपल्या साऱ्यांचे खायचे दात उघड होत असल्याने सारे शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे राजकारण करू लागले आहेत.
          शेतकऱ्यांनी आता या राजकीय भुलभुलैय्याचे शिकार न होता आपल्या मागण्यांचा प्रस्ताव आपल्या लोकप्रतिनिधी, म्हणजे आमदार खासदारांना द्यावा व ते प्रश्न विधानसभेत वा संसदेत मांडण्यास सांगावे. त्यांना यासाठी ठराविक मुदत द्यावी व त्याची पोच घ्यावी. या साऱ्या लोकप्रतिनिधींना, मग ते सत्ताधारी असोत की विरोधक, आपल्या दृष्टीने काही फरक पडत नाही, कारण आपले प्रश्न विधीमंडळात जाण्याशी आपले मतलब आहे. यावर दिलेल्या मुदतीत लोकप्रतिनिधींनी हे प्रश्न न मांडल्यास आपल्या परिक्षेत्रातील न्यायालयात या लोकप्रतिनिधींच्या विरोधात आपले कर्तव्य पार न पाडण्याचा गुन्हा दाखल करावा व मतदार संघातील साऱ्या शेतकऱ्यांच्या सह्या दाखल करत या लोकप्रतिनिधीवर आमचा विश्वास न राहिल्याची याचिका करावी. त्यावर काय करायचे ते न्यायालय ठरवील परंतु आपले प्रश्न मार्गी लावण्याचा तो एक प्रभावी सनदशीर मार्ग असल्याचे दिसून येईल. यातून शेतकऱ्यांचे बाजूचे नेमके कोण आहेत हे सिध्द होण्यामुळे स्वार्थी राजकारण्याचे भविष्यही अधोरेखित होत असल्याने निवडणुक होण्याआधीच तिच्या निकालाची कल्पना येऊ शकेल. घाणेरड्या राजकारणाचे शुध्दीकरण, नागरिकांचे सक्षमीकरण व परिणामकारक लोकशाही हे तिन्ही उद्देश यात साध्य होत असल्याने जागरूक शेतकऱ्यांनी हा प्रयोग करून पहाण्यास हरकत नाही.
                                                                  डॉ. गिरधर पाटील 9422263689

रविवार, १६ एप्रिल, २०१७

कर्जमुक्तीचा सोपा मार्ग



                कर्जमुक्तीचा सोपा मार्ग
एकादा विषय न समजल्याने आलेल्या अपयशामुळे त्यातील प्रश्नच सोडवायचे नाहीत अशी अवस्था शेती या विषयाबाबत आपल्या सरकारांची झालेली दिसते. शेतीसाठी काहीही केले तरी शेतीची विपन्नावस्था काही संपत नाही त्यामुळे शेवटी सत्ता टिकवण्याला प्राधान्य देत सरकारचा कालहरणाचा प्रयोग चालू आहे. कर्जमाफीच्या बाबतीत सरकारची भूमिका स्पष्ट आहे. पहिली गोष्ट म्हणजे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची परिस्थिती कितीही हलाखीची असली तरी कर्जमाफी हा काही त्यावरचा उपाय नाही. दुसरीकडे यांचेच सरकार असलेल्या उत्तर प्रदेशात हाच उपाय ग्राह्य व वैध मानला जातो. व दुसरी म्हणजे राज्याची आर्थिक परिस्थिती लक्षात राज्याला हा सुमारे तीस हजार कोटींचा भार पेलवणे शक्य नाही.
          शेतकऱ्याच्या हलाखीची कारणमीमांसा करतांना शेतकऱ्यांचे उत्पादन कमी म्हणून त्यांचे उत्पन्न कमी असे आपले कृषिखात्यातील उच्चविद्याविभूषित गणंग सांगत होते. त्यावर आपल्या शेतकऱ्यांनी आपले उत्पन्न कैक पटीत वाढवले तर त्याला सामावून घेणारा शेतमाल बाजार सरकारने आपल्या कचाट्यात ठेवत या वाढीव उत्पन्नाला किमान उत्पादन खर्चही मिळू द्यायचा नाही अशी सरकारची धोरणे. एकाद्या बाजारात विक्रेत्यांची संख्या ज्या प्रमाणात वाढेल त्या प्रमाणात खरेदीक्षमता वाढवाव्यात हे सरकारला उमजत नाही. कारण ठिकठिकाणच्या शेतमाल बाजारात फोफावलेला एकाधिकार. शेतकऱ्यांचा माल त्यांच्या भावात विकला नाही तर त्यांनी तो फेकूनच द्यावा असा आपला कायदा आहे. सरकार एकतर या बाजाराला उचित न्याय देत नाही दुसरीकडे त्याच्या स्वबलावर खुलेपणातून विकसितही होऊ देत नाही. आज या बाजारात खरेदीसाठी तयार व उत्सुक असणारे अनेक रोजगारनिर्मितीक्षम घटक या बाजारात येऊ दिले जात नाहीत. लासलगांवच्या कांदा व्यापाऱ्यात कोंडाळ्यातील जून्या व्यापारी परिवाराशिवाय खरेदीला कोणाला परवानगी देऊ नये असा फतवा सरकारच्या बाजार समितीवर बंधनकारक ठरत असून पणन खाते केवळ आपल्या निजी स्वार्थासाठी त्यावर शेतकऱ्यांना काही न्याय मिळेल अशी कारवाई करायला धजावत नाही. वाशीच्या बाजार समितीत नव्या खरेदीदाराचा गाळा व शेतमाल दिवसाढवळ्या पेटवून त्याला हाकलून दिले जाते. कारवाई शून्य. विदर्भातील कापूस बाजार, कोल्हापूरातील गूळ बाजार, वाशीतील आंबा बाजार, सांगलीतील हळद बाजार, जळगावातील केळी बाजार असे अनेक बाजार या माफियांच्या हातात गेले असून केवळ संपावर जाण्याच्या धाकाने ते सरकारला आपल्या बोटावर नाचवत असतात. या बाजारात खरेदीची पर्यायी व्यवस्था उभी रहावी अशी सरकारची इच्छा व क्षमताही नाही. अशावेळी सरकार हा बाजार आपल्या ताब्यात ठेवण्याचा अश्लाघ्य प्रयत्न करत शेतकऱ्यांच्या शेतमालाला उचित न्याय मिळण्यापासून का रोखते आहे हे कळत नाही.
          याचे साधे व सरळ कारण आहे की या बाजारातून निर्माण होणारा अवैध पैसा. या अवैध पैशांचे प्रमाण एवढे आहे की एकाद्या राजकीय पुढाऱ्याला मंत्री होतो कि बाजार समितीचा सभापती तर तो नक्कीच बाजार समितीचा सभापती होईल. आज सरकारला भेडसावणाऱ्या तीस हजार कोटींची तरतूद केवळ या बाजारातील शेतकऱ्यांची अवैधरित्या होणाऱ्या लूटीला आळा घातला तरी त्यातून होणाऱ्या करचुकवेगिरीतून करता येईल. या पारदर्शकतेतील स्पर्धात्मक वातावरणामुळे शेतकऱ्याला उचित दर मिळालातर त्याचा कर्जबाजारीपणा आटोक्यात येत आजच्यासारख्या अराजक वा असंतोषाला तोंड देण्याची सरकारला गरज रहाणार नाही. दुसरा भाग असा की या बाजाराच्या मर्यादित खरेदीक्षमतांमुळे शेतकऱ्यांनी पिकवलेल्या मालाची जी हानि होते ती त्याच्या वैयक्तीक नुकसानीबरोबर राष्ट्रीय उत्पादनाचीही हानि करते हे कोणी लक्षात घेत नाही. म्हणजे या वाढीव उत्पादनाचे आकडे सरकार आपली पाठ थोपटून घेण्यासाठी राष्ट्रीय सकल उत्पन्नात धरते त्याचवेळी पुढे या शेतमालाचे काय झाले याबाबत मात्र मूग गिळून बसते.
          2008 च्या कॅगच्या उपलब्ध आकडेवारीनुसार राज्यातील कृषि उत्पन्न हे सुमारे चार लाख कोटींचे असल्याचे दाखवले आहे. याच अहवालात पुढे असेही म्हटले आहे की राज्यात तीनशे पाच बाजार समित्या कार्यरत असून त्यात दरवर्षी सुमारे चाळीस हजार कोटींची उलाढाल होते. म्हणजे नियमनमुक्तीपूर्व काळात ज्या शेतमालाला बाजार समित्यांशिवाय पर्याय नव्हता त्या बाजार समित्यातून केवळ दहा टक्के शेतमालाची विक्री हिशोबात दाखवली जात असे. यात शेतमालाच्या भावाबरोबर बाजार समित्यांचा सेस, सरकारचा विक्री व इतर अनुषांगिक कर, या शेतमालाच्या हमाली, वाहतूक वा जकातीसारखे इतर कर चुकवून कोणाच्या खिषात जातात हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही. परळीसारखी छोटी बाजार समिती, जी अगोदर वीस लाख रुपये तोट्यात होती एका कार्यक्षम सचिवाने या गळतीला आळा घालताच केवळ तीन महिन्यात दोन कोटी रुपयांच्या फायद्यात आली. एवढा फरक लक्षात आल्यानंतर या सचिवाचे कौतुक करण्याऐवजी आपल्या राजकीय व्यवस्थेने पणन खात्याला हाताशी धरून या सचिवाला सळो की पळो करत कामावरून काढून टाकले व आज तीच बाजार समिती चिपाड होत कर्जबाजारी झाल्याचे दिसते. हे एक उदाहरण बाजार समित्यांमध्ये काय चालते हे दाखवायला पुरेसे आहे.
          म्हणजे सरकारने केवळ या हिशोबात दाखवल्या न गेलेल्या शेतमालाच्या विक्रीतील गळती थांबवली व हे कराचे दर किमान दहा टक्के धरले तरी दरवर्षी सरकारचे उत्पन्न छत्तीस हजार कोटींनी वाढू शकते. शिवाय वाढलेल्या खरेदीक्षमतांमुळे स्पर्धा होत शेतमालाला अधिकचा भाव मिळू शकेल व त्याला कर्जात ढकलणाऱ्या संकटाचे परिमार्जनही होऊ शकते. मात्र सरकारला शेतकऱ्यांची झाली लूट ही शेतकऱ्यांना परत मिळवून देण्यापेक्षा आपल्या राजकीय व्यवस्थेला सत्ताकारण व राजकारण करण्यासाठीच मिळवण्याचा अट्टहास दिसतो आहे.
          माझी सरकारला विनंती आहे की प्रामाणिक जनतेचा पैसा सरकारमध्ये आज ज्या मार्गाने हडप होतोय त्या मार्गाने शेतकऱ्यांना कर्जमाफी मुळीच नको. तो पैसा तुम्हालाच लखलाभ होवो, मात्र शेतकऱ्यांच्या हक्काचे जे पैसे तुमच्या चुकीच्या धोरणामुळे नको त्या घटकांच्या घशात घालताहात तेवढे काढून परत त्याची लूट वापसी करा. असे जर झाले तर एकाद्या वर्षी द्यावी लागणारी कर्जमाफी परत द्यावी लागणार नाही याची हमी मात्र तुम्ही मागितली नाही तरी आम्ही देतो एवढे मात्र नक्की.
                                                                    डॉ. गिरधर पाटील 9422263689

नियमनमुक्तीतून कर्जमुक्ती



               नियमनमुक्तीतून कर्जमुक्ती
     सध्या कर्जमुक्ती हा राजकीय परावलीचा शब्द झाला आहे. आपल्या राजकीय व्यवस्थेला कालहरण करण्यासाठी अशी हाडकं चघळण्यासाठी लागतात. करायचं काहीच नाही, होऊही द्यायचं काहीच नाही दरम्यान मात्र आपला स्वार्थी ध्येयभाग उरकत रहायचा असा सत्ताधारी व विरोधकांचा कार्यक्रम असतो. पंक्तीला बसलेले ते सत्ताधारी व त्यांच्यामागे आशाळभूतपणे ताटकळणारे विरोधक यांच्यात तसा आता गुणात्मक फरक राहिलेला नाही. सत्ताधाऱ्यांच्या भर पंक्तीत एकादी जागा रिकामी झाली तर विरोधकांतला कोणीही तिथे चपखलपणे विराजमान होऊ शकतो अशी ही आपली व्यवस्था असतांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत मात्र काहीच होऊ द्यायचे नाही असा दोघांमध्ये अलिखित करार झालेला असतो. देव जाणे एकाद्यावेळी शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले आणि तो आत्मनिर्भर होत स्वतंत्रपणे जगू लागला तर या साऱ्यांची राजकीय दुकाने बंद व्हायला वेळ लागणार नाही हे त्यांना चांगले माहित असल्याने येणाऱ्या निवडणुकीत शेतकऱ्यांना कोण अधिक मूर्ख बनवत वेड्यात काढतो व त्यांच्या मतांवर सत्ता मिळवतो यात साऱ्या पक्षांची स्पर्धा लागलेली दिसते.
          देशातल्या साठ टक्के लोकसंख्येच्या मतांवर सत्ता उपभोगणाऱ्या सरकारांची प्राथमिकता कुणासाठी आहे ते बघा. पहिली प्राथमिकता तर स्वतःसाठी असणार हे निश्चित असतांनाच देशातील जनतेचे आपण काही देणे लागतो हे न लक्षात घेता एकदा सत्ता मिळाली की पाच वर्षात देशाची सारी राजकीय, सामाजिक व आर्थिक घडी विस्कवटत आपला निजी कार्यक्रम ढकलत रहाण्याचा उद्योग चालतो. कर्जमुक्तीसाठी राज्याकडे पैसे नसल्याची सबब सांगितली जाते. कुणीही जनसामान्यांनी मागणी न केलेल्या स्मारकांसाठी यांच्याकडे पैसे आहेत. निव्वळ समुद्रात घडाभर पाणी ओतण्याच्या स्मारकांच्या पूजेसाठी सत्तर पंचात्तर कोटी हे खर्च करू शकतात. त्यातल्या जाहिरातीत ज्याच्या जीवावर हा सारा खेळ चाललाय तो शिवाजी एका कोपऱ्यात व यांच्या छब्या डोळ्यात भरतील अशा. देशातील किती टक्के लोक ज्या बुलेट ट्रेन मधून जाऊन आपल्या देशाचा उध्दार करतील याचा विचार न करतां नव्वद हजार कोटी खर्च करण्याची यांची तयारी असते. वर मखलाशी करतात की यासाठी कर्ज मिळणार आहे म्हणून. अरे फुकट्यांनो, तुम्ही हातात कटोरा घेऊन साऱ्या जगात तरी फिरलात तरी तुम्हाला तुमच्या लायकीवर कोणी एक फुटकी कवडी देणार नाही. देशाला कर्ज मिळते ते देशातील जनतेच्या साधनसामग्रीवर, उद्यमशीलतेवर व उत्पादकतेवर. कर्ज देणारा देश देशातील जनतेच्या पतीवर तुम्हाला कर्ज देतो, तुम्ही तर पाच वर्षांचे भाडेकरू आहात, देशाचे कायमस्वरूपी मालक असल्यासारखे वागून जनतेच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर उभा करण्याचेच तुमचे कर्तृत्व रहाणार आहे, जरा जमीनीवर या.
          समृध्दीचा कुठलाही मागमूस नसलेली केवळ उत्पादनाचे माध्यम हस्तगत करण्यासाठी केवळ सातशे किमि चा हा रस्ता प्रकल्प हा राज्यातील पंचवीस टक्के शेतकऱ्यांना त्यांची उपजाऊ जमीन न उपजिविकेचे साधन हस्तगत करत त्यांना देशोधडीला लावणार आहे. या प्रस्तावित रस्त्याच्या आजूबाजूच्या जमीनी या कधीच राजकारणी व प्रशासनातील बड्या धेंडानी लुबाडल्या आहेत. आपल्या कारभारातून निर्माण होणाऱ्या प्रचंड भ्रष्टाचारी पैशांच्या गुंतवणुकीचे एक सुलभ साधन म्हणून सरकार हा प्रकल्प राबवण्याचा अट्टाहास धरते आहे. उत्पादनाची साधने आपल्या ताब्यात घेण्याच्या या प्रकल्पातून काही दिवसांनी हाच परागंदा झालेला शेतकरी या बड्या धेंडाकडे गुलाम म्हणून राबणार असल्याचे चित्र दिसू लागले आहे.
          या फुकटखाऊ संस्कृतीची सारी मदार ही राज्याच्या कारभारातून निर्माण होणाऱ्या अवैध संपत्तीवर असते. यांच्या दृष्टीने चराऊ कुरण असते ते औद्योगिक क्षेत्र, व्यापार-सेवा क्षेत्र व राहिलेले कृषि क्षेत्र. यापैकी औद्योगिक व सेवा क्षेत्रातील शोषणावर त्यातील संघटितपणा, कायदे व त्या क्षेत्राची जागरूकता यामुळे अगोदरच मर्यादा येत असतात. राहिले ते कृषि क्षेत्र त्यातील शोषणाची व्याप्ती, आकार व सुलभता पाहिली तर एक कर्जमाफी काय शेतकऱ्यांना तुमच्या भुक्कड कर्जाची आवश्यकताच कधी रहाणार नाही एवढे सामर्थ्य असल्याचे सारी आकडेवारी सांगते. या आकडेवारीकडे सरकार सहेतुक दूर्लक्ष करीत असते कारण त्यातील स्फोटकता. सदरची आकडेवारी ही कुणा बाहेरच्या अभ्यास व संस्थेची नसून वैधानिकरित्या स्थापन झालेल्या कॅग या घटनात्मक संस्थेची आहे. मी पहिल्यांदा यातील आकडेवारीनुसार शेतीच्या शोषणाचा आकडा प्रसिध्द केला तेव्हा अनेक वृत्तपत्रांची ती हेडलाईन होती. सत्ताधारी तिच्याकडे दूर्लक्ष करणार हे स्वाभाविकच असले तरी विरोधकांनाही त्यात अभ्यास करावा असे वाटले नाही. कारण हे चराऊ कुरण साऱ्यांना त्याची घडी विसकटू न देता जसेच्या तसे खायला हवे असते.
          एकीकडे शेतीक्षेत्राला प्रचंड मदती देत असल्याचे सांगत रहायचे, मात्र ती मदत शेतकऱ्यांकडे न जाता कुठे जाते यांच्या तक्रारींकडे दूर्लक्ष करीत रहायचे हा या व्यवस्थेचा स्थायीभाव झाला आहे. दोन चार हजाराचे वीज बिल न भरलेल्या शेतकऱ्यांचे ही व्यवस्था वाभाडे काढते मात्र शेतकऱ्यांच्या मदतीचे करोडो रुपयांचे अपहरण करणाऱ्या एकाही अधिकाऱ्यावर काय कारवाई केली हे सरकारने दाखवावे. अशी कारवाई होणे कधीच शक्य नाही कारण सरकार या व्यवस्थेचा सारा जीव या भ्रष्टाचारी रसदीत असतो व वरवर एकादा कर्मचारी तात्पुरता निलंबित करून सारी चौकशी थाबवण्यातच साऱ्यांचा प्रयत्न असतो. राज्याचा कृषिमंत्री आपल्या खात्यात नेमके काय चालले याबाबत अनभिज्ञ असेल व शेतकऱ्यांच्या करोडोंच्या मदती लाटणाऱ्या अधिकाऱ्याचा त्याला मागमूसही नसेल तर कुणाच्या हाती आपण राज्याच्या तिजोरीच्या किल्ल्या सोपवल्या आहेत या विचाराने धडकी भरते. यातलं वास्तव असे आहे की अशा प्रकारात मंत्र्यांपासून चपराशापर्यंत सारे सामील असतात व उघडकीस आलेले प्रकरण कसे हाताळावे यात आपली नोकरशाही पारंगत झाल्याने मिटवामिटवीत त्याचा फायदा परत त्याच व्यवस्थेला होत असतो. ज्याचे पैसे लुबाडले गेले तो शेतकरी मात्र आपल्या मदती कुठे गेल्या या शोधात वेडा ठरत रहातो.
          ज्याच्या घरात चोरी झाली तो शेतकरी आपली लूट कुठे हे न शोधता त्याला परत या चोरांचीच याचना करावी लागते यासारखा विरोधाभास नसेल. फक्त जागरूक शेतकरी जरी एकत्र आला तरी फारसे प्रयास न करता निष्फळ आंदोलने न करता सरकारला कचाट्यात पकडू शकतो. मात्र आज अगतिक ठरलेला शेतकरी आपल्या डोळ्यावरील झापडं जोवर काढत नाही तोवर ही राजकीय व्यवस्था त्याचा फूटबॉल करीत राहील एवढे मात्र नक्की !!
                                                                  डॉ. गिरधर पाटील 9422263689
(यातील लूटवापसीचा कार्यक्रम पुढच्या लेखात)